मुंबई: भारतीय संघाने २०२३ ची सुरुवात शानदार विजयाने केली आहे. भारत आणि श्रीलंका यांच्यातील टी-२० मालिकेला आजपासून सुरुवात झाली आणि पहिल्याच सामन्यात टीम इंडियाने श्रीलंका संघावर २ धावांनी थरारक विजय मिळवला. यासह भारताने टी-२०मालिकेत १-० अशी आघाडी मिळवली आहे. तर भारतासाठी टी-२० मध्ये पदार्पण करणाऱ्या शिवम मावीने आजच्या सामन्यात आपली कामगिरी दाखवत ४ विकेट्स मिळवले. आजच्या या टी-२० सामन्याचे शेवटचे षटक अतिशय थरारक होते. पाहूया या शेवटच्या सामन्यात काय घडलं.
श्रीलंकेच्या डावाची सुरुवात फारशी चांगली झाली नाही. भारताने श्रीलंकेला १६३ धावांचे आव्हान दिले होते. भारताकडून शिवम मावीने दुसऱ्याच षटकात पहिली विकेट घेत श्रीलंकेला दणका दिला आणि नंतर प्रत्येक षटकात एकेक विकेट एकूण ४ विकेट्स घेतल्या. तर उमरान मालिकच्या खात्यात २ विकेट, हर्षल पटेलने २ विकेट्स मिळवल्या. तर धावा करायच्या नादात श्रीलंकेचे २ खेळाडू धावबाद झाले. भारताकडून अक्षर पटेलने शेवटचे षटक टाकले.
सामन्याचे शेवटचे षटक
या सामन्यातील शेवटचे शतक प्रथम हार्दिक पंड्या टाकणार होता. पण हार्दिकने षटक ना टाकता अक्षरकडे चेंडू सोपवला. अक्षरकडे चेंडू दिला तेव्हा श्रीलंकेला ६ चेंडूत १२ धावांची आवश्यकता होती. अक्षरने पहिलाच चेंडू वाईड टाकला. त्यामुळे धावा कमी होत चेंडू मात्र वाढला. तर पुढच्या चेंडूवर रजिथाने एकदा धाव घेत करुणारत्नेला स्ट्राईक दिली. करुणारत्ने अक्षरच्या चेंडूवर गडबडला, वाईड चेंडू समजत त्याने तो चेंडू ड्रॉप केला. मात्र पंचांनी वाईड दिला नाही. तर तिसऱ्या चेंडूवर थेट करुणारत्ने षटकार मारत चेंडू स्टँड्समध्ये पाठवला आणि भारतीय संघ पुन्हा एकदा दबावाखाली आला.
करुणारत्ने स्ट्राईकवर होता तर या बाजूला मधुशंका धाव घेण्यासाठी तयार होता. अक्षरच्या चेंडूवर करुणारत्नेने बॅट फिरवली खरी पण चेंडू काही लांब गेला नाही. हे कळताच मधुशंका आणि करुणारत्ने धाव घेण्यासाठी जीव तोडून धावले. पुन्हा एकदा फिल्डिंग करत असलेल्या दीपक हुडाच्या हातात चेंडू आला आणि त्याने थेट ईशान किशनकडे चेंडू दिला आणि किशनने मधुशंकाला धावबाद करत भारताने श्रीलंकेच्या संघाला ऑल आऊट केले. अक्षर पटेलने शानदार गोलंदाजी करत करुणारत्नेला पुरते हैराण केले होते. अक्षर पटेलचे चेंडू त्याला ओळखता न आल्याने श्रीलंकेने दोन चेंडू गमावले.

.jpg)